Wednesday 6 July, 2011

मधुरिमा कुळकर्णी २ - रमेशची कैफियत

मधुरिमा कुळकर्णी १ - मीही एकदा पडलो प्रेमात


कुळकर्ण्यांची मधुरिमा मला, बाजारात ज्यादिवशी भेटली
जगात देव आहे याची खात्री, मला त्यादिवशी पटली

गोड, नाजूक मधुरिमा तेव्हा, एक हत्तीण झाली होती
ऐश्वर्या जाऊन तिच्या जागी, जयललिता आली होती

ही कॉलेजात क्वीन होती, यावर नव्हता विश्वास बसत
उभी होती दोन मुलांना, हातात धरून हसत हसत

पाचशे लिटरची टाकीसुद्धा, हिच्यासमोर होती लहान
तिला पूर्ण पाहण्यासाठी, मी दोनदा फिरवली मान

रमेशची मात्र उलटी स्थिती, दैव त्याचे फिरले होते
काळे घनदाट केस जाऊन, टक्कल मात्र उरले होते

आपण दिसतो हृतिकसारखे, असा त्याला होता माज
हृतिक कसला रमेश तर, केष्टो मुखर्जी होता आज

मला म्हणाला, ’वेळ काढून, एकदा ये घरी कधी
हिच्यासमोर तोंड उघडायची, तेवढीच मला एक संधी’

त्याला बरं वाटेल म्हणून, गेलो एकदा त्याच्या घरी
मुलांसह मधुरिमा, गेली होती तिच्या माहेरी

ती माहेरी गेली म्हणून, रमेश होता भलताच खुशीत
मध्येच गाणी म्हणत होता, हसत होता मिशीतल्या मिशीत

मला म्हणाला, ’तुला सांगतो, माझ्या जीवनाची कहाणी
घरात आहे मी नोकर, ती मात्र आहे महाराणी

दिवसभर झोपा काढते, काम काही करत नाही
मला छळण्यासाठी तिला, जन्मदेखील पुरत नाही

सकाळी उठते दहा वाजता, नंतर लगेच हवा चहा
ब्रेकफास्टला हवी तिला, अंडी उकडून नऊ-दहा

तीही द्यायची नवर्‍याने, ही फक्त सोडते ऑर्डर
आज्ञापालन झालं नाही, तर करेल माझा मर्डर

बारा ब्रेड आणि बटर, अंड्यांसोबत लागतात तिला
तिचा आहार बघून बघून, रोज चक्कर येते मला

जेवणाचीही हीच तर्‍हा, पोळ्या खाते किमान आठ
दीड किलो भात सोबत, वर हवी साय दाट

एवढी सुजली आहे तरी, खात असते उठता बसता
बकासुरही हिच्यासमोर, झुरळासारखा दिसला असता

दिवसभर काम करून, मोडून जाते माझी पाठ
हिचा मात्र बसल्या जागी, कायम असतो थाटमाट

केर काढा लादी पुसा, भांडी घासा धुणी धुवा
असं नशीब शत्रूलाही, कधी देऊ नकोस देवा

एवढं करूनही मला, माझ्या घरात स्थान नाही
नोकरमंडळींना असतो, तेवढासुद्धा मान नाही

वटपौर्णिमेला हिने, माझ्यासाठी उपास केला
उपास म्हणजे दिवसभरात, खाल्लं फक्त पाच वेळा

त्या दिवशी माझी कैद, निश्चित झाली सात जन्मांची
’हा जन्म लास्ट असू दे’, मी प्रार्थना केली देवाची,

’पुढल्या जन्मी मला देवा, गाढव किंवा कुत्रा कर
पण अशी बायको नको, हाच आता दे वर’

आकार तिचा एवढा मोठा, हत्तिणीसारखी चाल
लाँड्रीवाला भैयासुद्धा, येऊन मला म्हणाला काल,

’साब, मॅडमके कपडोंको, आजसे आपही इस्त्री करना
नहीं तो इस्त्री करनेका, सौ रुपिया ज्यादा भरना’

तिला माहित एकच गोष्ट, सदासर्वकाळ खात राहणं
मी मात्र जगतो आहे, अपमानास्पद गुलामाचं जिणं’

रमेशची ही कैफियत, ऐकून आलं डोळ्यांत पाणी
थँक्यू देवा मधुरिमा, झाली नाही माझी राणी

नकार तिचा ऐकून तेव्हा, दोष दिला होता तुला
आता पटतंय एका मोठ्या, संकटातून तारलंस मला....

Friday 26 November, 2010

एका कार्यकर्त्याची मुलाखत

मुलाखतकार: नमस्कार, मी दैनिक ‘समृद्ध भारत’ मधून आपली मुलाखत घ्यायला आलो आहे.
कार्यकर्ता: (स्वगत: च्यायला, एकटाच आला. मी आणखी तीन पेपरांच्या प्रतिनिधींना बोलावलं होतं. आता प्रसिद्धीचे दुसरे मार्ग शोधायला हवेत. ब्लॉग लिहायला सुरुवात केली पाहिजे आता) नमस्कार, या या. (स्वयंपाकघराकडे वळून) अगं ए, जरा दोन कप चहा ठेव गं. (मुलाखतकाराकडे वळून) तसा मला अजिबात वेळ नसतो. मी भयंकर व्यस्त असतो. कामं असतात हो. आजही दोन अपॉइंटमेंट्स रद्द कराव्या लागल्या या मुलाखतीसाठी.
मुलाखतकार: पण मला तर संपादक म्हणत होते की तुम्ही बरेच दिवस आमच्या कार्यालयात फोन करून आम्ही तुमची मुलाखत घ्यावी म्हणून विनवत होतात. आता तुम्ही आमच्या पेपरला देणगी देणार असं ऐकल्यावर संपादकांनी मला पाठवलं मुलाखत घ्यायला...
कार्यकर्ता: !!!
मुलाखतकार: (आयला, मी बहुतेक भलतंच काहीतरी बोललो. आता सारवासारव करायला हवी...) अं... फार उकडतंय नाही?
कार्यकर्ता: (स्वगत: संपादक साला बामण आहे. म्हणून माझी बदनामी करतोय...) हो ना. एसी लावू का? आमच्याकडे एसी आहे ना! मागच्याच आठवड्यात घेतला. ४५ हजारांना...
मुलाखतकार: (स्वगत: ४५ हजारांना घ्या, नाहीतर ४५ लाखांना. मला काय करायचं आहे?) तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया. सर्वप्रथम माझी ओळख करून देतो. मी राजेंद्र साठे. दैनिक ‘समृद्ध भारत’ मध्ये वार्ताहर म्हणून कामाला आहे.
कार्यकर्ता: (हाही भटच आहे! साल्याला वास्तविक मी मुलाखत द्यायला नको, पण बाकीच्या वृत्तप्रतिनिधींनी माझ्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही, तेव्हा याला उत्तरं द्यावीच लागणार. अडला हरी... दुसरं काय?) अच्छा. बोला. काय विचारायचं आहे तुम्हाला?
मुलाखतकार: आपलं नाव काय?
कार्यकर्ता: तुम्हाला माझं नावही माहित नाही?
मुलाखतकार: अहो, मला माहित आहे हो. पण मुलाखतीत नाव विचारण्याची पद्धत असते म्हणून विचारलं.
कार्यकर्ता: बरं. माझं नाव सुमीतराजे रामटेकवांदेकर.
मुलाखतकार: आपलं शिक्षण किती झालं आहे?
कार्यकर्ता: मी फार्टोग्राफीमध्ये डिग्री घेतली आहे.
मुलाखतकार: कशामध्ये???
कार्यकर्ता: फार्टोग्राफी
मुलाखतकार: Ohh.. You mean Photography!
कार्यकर्ता: हां, तेच ते...
मुलाखतकार: पण तुमच्या शाळेत जाऊन आलो मी. तिकडचे रेकॉर्ड्स बघितल्यावर कळलं की चौथीत तीनवेळा नापास झाल्यावर तुम्हाला शाळेतून काढलं.
कार्यकर्ता: तिकडचे सगळे मास्तर बामण होते. हा माझी बदनामी करण्यासाठी रचलेला बामणी कावा आहे!
मुलाखतकार: अहो, पण तुम्ही मिशनरी स्कूलमध्ये होता ना? तिकडचे बहुतांशी शिक्षक ब्राह्मण तर सोडाच, हिंदूही नाहीत. ख्रिश्चन आहेत.
कार्यकर्ता: असं तुम्हाला वाटतं. पण बामणांना ख्रिश्चन म्हणून प्रमोट करायचं, बहुजनांवर अत्याचार करायचे आणि ख्रिश्चनांवर नाव ढकलायचे ही त्या भटांची चाल होती.
मुलाखतकार: असो. तुम्ही सध्या काय करता?
कार्यकर्ता: मी महाराज आर्मीचा एक कार्यकर्ता आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर समाजाचं ऋण फेडायला हवं या उदात्त भावनेने समाजसेवेचं असिधाराव्रत स्वीकारलं आहे. मला धनाचा मोह नाही. मी समाजात सुव्यवस्था स्थापन व्हावी यासाठी कार्य करतो. कोणा एका समाजाला महत्त्व देऊन दुसर्‍या समाजावर अन्याय हो‍ऊ नये यासाठी मी कायम प्रयत्नशील असतो. मी निर्मोही आहे. लग्न झाल्यावर हिचा बाप मला खूप जास्त वरदक्षिणा देणार होता. पण, मुळातच पैशाचा मोह नसल्याने मी तो नाकारला. हां, आता सासरेबुवांना वाईट वाटू नये म्हणून एक प्रतीकात्मक वरदक्षिणा स्वीकारली. एक स्कॉर्पियो गाडी, दोन मजली एक बंगला, पंधरा तोळे सोनं, एक लाखाची कॅश सोडता मी एक छदामही घेतला नाही सासर्‍यांकडून. तसा मी स्वाभिमानीही आहे. मला कोणी....
मुलाखतकार: (मध्येच थांबवत) असो. पुढचा प्रश्न. तुमची संस्था काय कार्य करते?
कार्यकर्ता: आमची संस्था भारतात एकोपा निर्माण करण्यासाठी झटते. समाजातील बहुजन घटकांवर अन्याय हो‍ऊ नये म्हणून कार्य करते. बामणांना स्वतःला श्रेष्ठ समजून बाकीच्यांवर अन्याय करण्याची सवय असते. आम्ही हा असा अन्याय खपवून घेत नाही. बहुजनांतर्फे आम्ही आवाज उठवतो. शेवटी काय, सगळ्या जातींतले लोक सारखेच असतात असं आपल्या कॉन्स्टिपेशननेच मान्य केलं आहे.
मुलाखतकार: (विजारीत झुरळ शिरल्यासारखा किंचाळतो) काऽऽऽऽऽऽय???
कार्यकर्ता: अहो, असं काय करता? कॉन्स्टिपेशन म्हणजे राज्यघटना! घटनेनेच सर्वांना समान अधिकार दिले आहेत, नाही का? माफ करा, पण तुमचं इंग्लिशवर म्हणावं तेवढं प्रभुत्व नाही.
मुलाखतकार: (अजून धक्क्यातून सावरला नाहीये हा!) आं? हां, हो हो. माझं इंग्लिश थोडं कच्चं आहे. तर पुढचा प्रश्न. चंदावरकर इन्स्टिट्यूटवर हल्ला महाराज आर्मीने केल्याचं ऐकलं होतं...
कार्यकर्ता: हा हल्ला समर्थनीय होता. आमच्या महाराजांवर त्या चंदावरकर इन्स्टिट्यूटच्या भटांनी शितोडे उडवले होते. त्यांचं हे असंच व्हायला हवं होतं. साले माजले आहेत सगळे!
मुलाखतकार: काही महत्त्वाची कागदपत्रंही जाळली म्हणे...
कार्यकर्ता: अजिबात नाही. आम्ही कुठलीही कागदपत्रं जाळली नाहीत. आम्हाला एवढी अक्कल नाही असं समजू नका. हा सगळा भटांचा कावा आहे. आणि मिडीयावालेही भटांचेच भक्त. त्यांनी भटांचं हे म्हणणं उचलून धरलं. सरकारही बामणांनाच सामील.
मुलाखतकार: अहो, पण तिकडच्या कॅमेर्‍यांमध्ये रेकॉर्डिंग आहे कागदपत्रं जाळतानाचं.
कार्यकर्ता: तो कॅमेराही खोटा होता आणि ते रेकॉर्डिंगही खोटं होतं. तीही बामणांचीच चाल होती. आमचे कार्यकर्ते गेल्यावर काही भटुरडे आत घुसले आणि त्यांनी मोडतोड आणि जाळपोळ केली. आणि निर्लज्जपणे हे रेकॉर्डिंग आमचं म्हणून दाखवलं. भटांची साली अवलादच खोटी!
मुलाखतकार: शांत व्हा, शांत व्हा. आपण दुसर्‍या विषयाकडे वळूया. आपल्या घरी कोण कोण आहेत?
कार्यकर्ता: मी, माझी बायको आणि माझा धाकटा भाऊ. मी समाजसेवक आहे, माझी बायको गृहिणी आहे आणि भावाची बटीक आहे.
मुलाखतकार: (विजेचा शॉक बसल्यासारखा) काऽऽऽय?
कार्यकर्ता: अहो बटीक म्हणजे कपड्यांचं दुकान हो. तुम्ही थोडं इंग्लिश सुधारा बरं...
मुलाखतकार: (स्वगत: मग रेड्या, बुटिक म्हण ना! मला कसं कळणार तुला काय म्हणायचं आहे ते?) आपल्या आर्मीबद्दल आणखी थोडी माहिती सांगा. म्हणजे स्थापना कशी झाली, कधी झाली वगैरे वगैरे...
कार्यकर्ता: आर्मीची स्थापना १९९९ साली झाली. तेव्हा साहेब आणि साहेबांचे दोन भाऊ एवढेच आर्मीचे सदस्य होते. त्यानंतर हळूहळू आर्मीचा विस्तार होत गेला. आणि आता ३ लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते आहेत. पण सुरुवात मात्र तिघांपासूनच झाली आहे. आर्मीच्या त्रिकोणाच्या दोन बाजू म्हणजे साहेबांचे दोन भाऊ आणि साहेब म्हणजे हिपोपोटेमस.
मुलाखतकार: हायपोटेन्युअस (आता याला सवय झाली आहे बहुतेक!)
कार्यकर्ता: तेच!
मुलाखतकार: आत्ताच तुम्ही म्हणालात की सरकार ब्राह्मणांना सामील आहे. पण सध्याच्या सरकारात तर अनेक अब्राह्मण लोक आहेत
कार्यकर्ता: अजिबात नाही! ते सगळे १००% बामणच आहेत. किंबहुना जगात जी वाईट कार्यं होतात त्यांच्या मुळाशी बामणच असतात!
मुलाखतकार: ओसामा बिन लादेन कुठे ब्राह्मण आहे?
कार्यकर्ता: आहे ना! निःसंशय तो भटुरडाच आहे! त्याचं मूळचं नाव ॐकारभाऊ लेले आहे. आणि तो बामणच आहे.
मुलाखतकार: हिटलरने लाखो ज्यूंना छळून मारलं. तो कुठे ब्राह्मण होता?
कार्यकर्ता: हिटलरही भटच होता. हा सगळा बामणांनी रचलेला बनाव आहे.
मुलाखतकार: अहो, पण हिटलर ब्राह्मण नसल्याचे पुरावे आहेत.
कार्यकर्ता: तो ब्राह्मणच होता!
मुलाखतकार: तुम्ही एवढ्या ठामपणे कसं काय म्हणू शकता? काय पुरावा आहे तुमच्याकडे?
कार्यकर्ता: हिटलरच्या एका सैनिकाने त्याच्या बायकोला लिहिलेलं पत्र वाचा. सगळं स्पष्ट होईल.
मुलाखतकार: कुठे मिळेल ते पत्र?
कार्यकर्ता: हिंगणेवाडीत प्रसिद्ध होणार्‍या सुप्रसिद्ध ‘बंधमुक्ती’ या दैनिकात ते प्रसिद्ध झालेलं आहे. हिटलर हा बामणच होता असं त्यावरून निःसंशयपणे सिद्ध होतं. अर्थात तुम्हाला नाही पटायचं ते. तुम्हीही भटच आहात! बहुजनांनी कितीही पुरावे दिले तरी ते तुम्हाला ग्राह्य वाटत नाहीत. आम्ही सांगितलेला वृत्तपत्राचा पुरावा तुम्हाला पटत नाही आणि आम्ही मात्र तुमच्या रेकॉर्डिंगवर विश्वास ठेवायचा! अजब न्याय आहे! तुम्ही सगळे भट सारखेच. साले ब्लडी बामण!
मुलाखतकार: मला एक कळत नाही, तुमचा एवढा राग का ब्राह्मणांवर? तुम्ही एखाद्या ब्राह्मण मुलीला लग्नासाठी मागणी घातलीत आणि तिने तुम्हाला चपलेने फोडलं असं काहीतरी घडलंय का तुमच्या आयुष्यात?
कार्यकर्ता: कोणी आम्हाला असं चपलेने फोडायला आम्ही काही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत!
मुलाखतकार: छे! बांगड्या तर जिने तुम्हाला चपलेने फोडलं तिने भरलेल्या असतील ना? शेवटी मुलगीच ती!
कार्यकर्ता: हे बघा, तुम्ही माझा अपमान करत आहात. जरा तोंड सांभाळून बोला.
मुलाखतकार: बरं. औरंगजेबाने संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं.
कार्यकर्ता: औरंगजेब हाही भटुरडाच होता. रोज सकाळी उठल्यावर तो शंकराची पूजा करायचा.
मुलाखतकार: जॉर्ज बुशने अफगाणिस्तान आणि इराकवर हल्ला केला.
कार्यकर्ता: तोही मूळचा भटच. रोज जेवायला बसण्याआधी चित्राहुती घालतो तो! एवढंच नव्हे, त्याची मुंजपण झाली आहे तो लहान असताना. साला बामण!
मुलाखतकार: अफजल गुरू आणि त्याच्या साथीदारांनी संसदेवर हल्ला केला.
कार्यकर्ता: तेही सगळे बामणच होते. त्यांना मुसलमान म्हणून प्रमोट करून मुसलमानांवर नाव ढकलायचं आणि स्वतः नामानिराळं राहायचं हा बामणी कावा होता. भटाबामणांच्या हलकटपणाची ही परंपरा थेट महाभारतातल्या रावणापासून सुरू झालेली आहे.
मुलाखतकार: रावण तर रामायणात होता हो...
कार्यकर्ता: तेच ते! हाच तर भटी कावेबाजपणा आहे! बहुजनांना बोलू द्यायचं नाही, आणि स्वतः बोललेलं सगळं खरं समजायचं.
मुलाखतकार: पण रावण रामायणात होता ही तर शतकानुशतके मान्य असलेली गोष्ट आहे.
कार्यकर्ता: आम्ही का मानावं ते? शेवटी विश्वामित्रही भटच होते ना? त्यांनी सांगितलेलं तेवढं खरं का?
मुलाखतकार: रामायण वाल्मिकी ऋषींनी लिहिलं आणि महाभारत महर्षी व्यासांनी लिहिलं!
कार्यकर्ता: तेही भटच!
मुलाखतकार: ओके. अजमल  कसाब आणि त्याच्या साथीदारांनी मिळून मुंबईवर दहशतवादी हल्ला केला.
कार्यकर्ता: तेही सगळे भटांचेच पायिक होते. एकाही भटाला त्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले नाहीत. जे लोक हल्ल्यात दगावले ते सगळे बहुजन होते.
मुलाखतकार: तुमचा कुत्रा फार भुंकतो.
कार्यकर्ता: तोही भटच आहे!
मुलाखतकार: तुम्ही खूप चिडताय.
कार्यकर्ता: कारण मीही भटच आहे!
मुलाखतकार: आँ??
कार्यकर्ता: नाही म्हणजे ते आपलं हे... तुम्ही नसते प्रश्न विचारून मला गोंधळात पाडलंत म्हणून असं म्हणालो मी. मला मुलाखत द्यायचीच नाही. चला चालते व्हा इथून. माझे विचार जगापर्यंत पोचवण्यासाठी मला कोणाचीही गरज नाही. तुमच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा मी स्वतः ब्लॉग लिहीन!
मुलाखतकार: अहो, पण आपली मुलाखत अर्धवटच राहिली आहे...
कार्यकर्ता: मुलाखत गेली खड्ड्यात! चला निघा!

टीप: वरील लेख, त्यातील व्यक्तिरेखा, त्यातील प्रसंग, त्यातील वाक्ये, त्यातील परिस्थिती ही संपूर्णपणे काल्पनिक असून त्यातील कोणताही भाग जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटनेशी, संघटनेशी, प्रसंगाशी, व्यक्तिरेखांशी, जातीशी, धर्माशी, भाषेशी, देशाशी, पुरुषाशी, स्त्रीशी, राजकारण्याशी, प्राण्याशी, निर्जीव वस्तूशी, खेळाशी थोडाजरी जुळत असेल तर तो एक निव्वळ योगायोग समजावा.

Monday 22 November, 2010

मधुरिमा कुळकर्णी १ - मीही एकदा पडलो प्रेमात


कॉलेजमध्ये असताना मीही एकदा पडलो प्रेमात
काहीतरी जादू होती कुळकर्ण्यांच्या मधुरिमात

मधुरिमा कुळकर्णी ही कॉलेजातली क्वीन होती
सगळी शिष्ट मुलंसुद्धा तिच्यासमोर दीन होती

गोरा होता रंग तिचा, नाजूक ओठांची कमान होती
ऐश्वर्याही तिच्यासमोर मायावतीसमान होती

घारे तिचे डोळे होते, कमनीय बांधा होता
ती पटत नाही हाच तर सगळ्यांचाच वांदा होता

तिला बघायला मुलं रोज न चुकता वर्गात यायची
ती मात्र सर्वांसमोर विनाकारण भाव खायची

एकदा रस्त्याने जाताना तिने मला धडक दिली
माझ्याकडली सगळी पुस्तके एकदमच खाली पडली

‘आय अ‍ॅम सॉरी’ म्हणत, ती पुस्तके उचलू लागली
माझ्या मनात तेव्हा प्रेमफुलं उमलू लागली

त्यानंतर आमची भेट वारंवार होऊ लागली
अफेअरची आशा मनात माझ्या आता जागू लागली

माझ्या मनातील भावना तिच्याही मनी असतील का?
प्रेममेघ तिच्या मनात माझ्यासारखेच बरसतील का?

असे प्रश्न दिवसरात्र मला सारखे छळू लागले
एक कोवळे नाजूक प्रेम माझ्या मनी रुळू लागले

एकदा धीर केला म्हटलं विचारूया आज तिला
जीवनभर साथ देशील का मला माझ्या प्रीतफुला?

रेस्टॉरंटमध्ये गेलो आम्ही बर्गरची ऑर्डर दिली
मी बोलण्याआधीच मात्र तिने बोलायला सुरुवात केली

काल माझं लग्न ठरलं, खूप आनंद झालाय मला
तू मला भावासारखा, म्हणून आधी सांगितलं तुला

मागे रमेशने लग्नासाठी केलं होतं मला प्रपोज
मी होकार दिला होता, घरी जरी झालं अपोज

काल मात्र बाबांनी लग्नाला माझ्या परवानगी दिली
मोठा भाऊ म्हणून मला, तुझीच आठवण आधी आली

रमेश माझ्या दुःखांवर एक रामबाण लोशन आहे
माझ्यासाठी कॉलेजमध्ये तोच हृतिक रोशन आहे

हे ऐकून माझ्या हृदयावर एक मोठा आघात झाला
काय पाहिलं त्या बोकडात असा विचार मनात आला

रमेश कसला हृतिक रोशन, एक नंबरचा पाजी आहे
तरीही ही त्याच्याबरोबर, लग्नासाठी राजी आहे

बोकड, गाढव, रेडा, हत्ती यांचं तो एक मिक्स आहे
तरीही आज त्याच्याबरोबर, हिचं लग्न फिक्स आहे

भाऊ म्हटल्याबद्दल मला मधुरिमाचा राग आला
बिल तिला भरायला लावून मी माफक सूड घेतला

तेव्हा ठरवलं आता कधी पडायचं नाही प्रेमात
एवढं काय ठेवलं आहे कुळकर्ण्यांच्या मधुरिमात

खूप वर्षांनी मधुरिमा मला एकदा बाजारात भेटली
ओळखलंच नाही तिला, मला ती जयललिताच वाटली

नाजूक मधुरिमा आता एक हत्तीण झाली होती
गोबर्‍या गालांच्या जागी आता गालफडं आली होती

गोलगप्पा झाली होती, सार्‍या बाजूंनी उसवली होती
मुलाचा हात धरला होता, मुलगी कडेवर बवसली होती

मागे उभा नवरा बघून मला लगेच साक्षात्कार झाला
नवरा नव्हे हिला तर एक फुकट हमाल मिळाला

उभा होता गपगुमान सगळ्या पिशव्या हातात घेऊन
बघत होता तिच्याकडे सतत दातओठ खाऊन

हतबुद्ध दिसत तो होता, चेहरा त्याचा उतरला होता
हृतिक जाऊन आता फक्त शक्ती कपूर उरला होता

थँक्यू देवा मनात म्हणालो, ही नव्हती माझ्या प्रेमात
काहीसुद्धा उरलं नाही कुळकर्ण्यांच्या मधुरिमात

-- संकेत



टीप: स्वामी संकेतानंदांचा कवितालेखनाचा क्रॅश कोर्स वाचून मला ही कविता लिहिण्याची बुद्धी झाली. त्यामुळे त्यांचे विशेष आभार.

Sunday 21 November, 2010

गणितातील गमतीजमती - १

गणित आणि गंमतजंमत हे शब्द बर्‍याच लोकांना विरुद्धार्थी शब्द म्हणून वापरण्याची सवय आहे. त्यामुळे हे नाव वाचून कदाचित तुमच्या भुवया उंचावल्या जाण्याची शक्यता आहे. पण गणितातही गंमत असते. बरेचसे गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी यांच्यात एक प्रकारची सममिती (Symmetry) असते. त्यामुळे एका प्रकारची गणितं सोडवता आली तर त्याच प्रकारची बरीचशी गणितं त्याच पद्धतीने सोडवता येतात. पण आज बेरजा कशा कराव्यात किंवा गणितं कशी सोडवावीत हा काही लेखाचा विषय नाही. आज काही गणितांमधली सममिती मला इथे मांडायची आहे. उदाहरणार्थ:

                                १ * १ = १
                            ११ * ११ = १२१
                        १११ * १११ = १२३२१
                    ११११ * ११११ = १२३४३२१
                १११११ * १११११ = १२३४५४३२१
            ११११११ * ११११११ = १२३४५६५४३२१
        १११११११ * १११११११ = १२३४५६७६५४३२१
    ११११११११ * ११११११११ = १२३४५६७८७६५४३२१
१११११११११ * १११११११११ = १२३४५६७८९८७६५४३२१

आता हा दुसरा पिरॅमिड पाहा:

                                ९ * ९ = ८१
                            ९९ * ९९ = ९८०१
                        ९९९ * ९९९ = ९९८००१
                    ९९९९ * ९९९९ = ९९९८०००१
                ९९९९९ * ९९९९९ = ९९९९८००००१
            ९९९९९९ * ९९९९९९ = ९९९९९८०००००१
        ९९९९९९९ * ९९९९९९९ = ९९९९९९८००००००१
    ९९९९९९९९ * ९९९९९९९९ = ९९९९९९९८०००००००१
९९९९९९९९९ * ९९९९९९९९९ = ९९९९९९९९८००००००००१

आणखी एक:

३७ * ०३ = १११
३७ * ०६ = २२२
३७ * ०९ = ३३३
३७ * १२ = ४४४
३७ * १५ = ५५५
३७ * १८ = ६६६
३७ * २१ = ७७७
३७ * २४ = ८८८
३७ * २७ = ९९९

हा पुढचा संख्येच्या वर्गावर (Square) आधारित आहे.

०१ = १^२
०१ + ०३ = २^२
०१ + ०३ + ०५ = ३^२
०१ + ०३ + ०५ + ०७ = ४^२
०१ + ०३ + ०५ + ०७ + ०९ = ५^२
०१ + ०३ + ०५ + ०७ + ०९ + ११ = ६^२
०१ + ०३ + ०५ + ०७ + ०९ + ११ + १३ = ७^२
०१ + ०३ + ०५ + ०७ + ०९ + ११ + १३ + १५ = ८^२
०१ + ०३ + ०५ + ०७ + ०९ + ११ + १३ + १५ + १७ = ९^२

(१^२ म्हणजे १ चा वर्ग (१), २^२ म्हणजे २ चा वर्ग (४), ३^२ म्हणजे ३ चा वर्ग (९) वगैरे वगैरे...)

आता खालचा पिरॅमिड बघा...

                  १ * ८ + १ = ९
                १२ * ८ + २ = ९८
              १२३ * ८ + ३ = ९८७
            १२३४ * ८ + ४ = ९८७६
         १२३४५ * ८ + ५ = ९८७६५
       १२३४५६ * ८ + ६ = ९८७६५४
    १२३४५६७ * ८ + ७ = ९८७६५४३
  १२३४५६७८ * ८ + ८ = ९८७६५४३२
१२३४५६७८९ * ८ + ९ = ९८७६५४३२१

आता हा शेवटचा:
12345679 * 09 = 111111111
12345679 * 18 = 222222222
12345679 * 27 = 333333333
12345679 * 36 = 444444444
12345679 * 45 = 555555555
12345679 * 54 = 666666666
12345679 * 63 = 777777777
12345679 * 72 = 888888888
12345679 * 81 = 999999999


टीप: शेवटचा ब्लॉक इंग्रजीत लिहिला आहे कारण मराठीत लिहिल्यावर तो नीट आयत दिसत नव्हता आणि त्याची शोभा जात होती.

Monday 15 November, 2010

गोष्टी माणसांच्या

सुधा मूर्ती. नारायण मूर्तींच्या पत्नी आणि इन्फोसिस फाऊन्डेशनच्या अध्यक्षा आणि विश्वस्त या नात्याने त्या सर्वांना ठाऊक आहेतच. त्या संगणकशास्त्राच्या प्राध्यापिका आणि एक समाजसेविकाही आहेत. इन्फोसिस फाऊन्डेशनतर्फे अनेक संस्थांना, अनेक लोकांना त्यांनी मदत केलेली आहे. कर्नाटक राज्यातल्या प्रत्येक शाळेत संगणक आणि वाचनालयाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्या एक प्रथितयश लेखिकाही आहेत. ‘महाश्वेता’, ‘वाईज अँड अदरवाईज’, ‘डॉलर बहू’, ‘हाऊ आय टॉट माय ग्रँडमदर टू रीड अँड अदर स्टोरीज’ ही त्यांच्या पुस्तकांपैकी काही प्रसिद्ध पुस्तके. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल भारत सरकारने २००६ मध्ये पद्मश्री पुरस्काराने त्यांचा गौरव केला होता.

या दिवाळीच्या निमित्ताने मी माझ्या बहिणीकडे आलो होतो. तिथे `हाऊ आय टॉट माय ग्रँडमदर टू रीड अँड अदर स्टोरीज’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद माझ्या नजरेस पडला. लीना सोहोनींनी ‘गोष्टी माणसांच्या’ या नावाने हा अनुवाद केला आहे. वेळ घालवण्यासाठी मी ते पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि पूर्ण झाल्यावरच खाली ठेवलं. पुस्तक पूर्ण होईपर्यंत वेळ कसा गेला कळलंही नाही. छोट्या गोष्टी, साधी सोपी भाषा आणि लेखिकेचं कथा सांगण्याचं कौशल्य या गोष्टींमुळे हे पुस्तक स्मरणीय झालेलं आहे. सुधा मूर्तींच्या आयुष्यात त्यांना भेटलेल्या अनेक माणसांच्या गोष्टी यात आहेत. पुस्तकाच्या पानापानांतून अनेक लोक गोष्टीरुपाने आपल्याला भेटतात आणि अनेक गोष्टी शिकवतात. प्रत्येकाने एकदा तरी वाचावं असं हे पुस्तक आहे आणि त्यातून शिकण्यासारख्या आणि घेण्यासारख्या बर्‍याच गोष्टी आहेत.

जमशेद टाटांबद्दलही एक गोष्ट यात आहे. सुधा मूर्ती जेव्हा इंजिनियरिंगला होत्या तेव्हा त्यांच्या कॉलेजात टेल्को कंपनीची नोकरासाठी नोटिस लागली होती. त्यात ‘स्त्रियांनी अर्ज करू नये’ असं लिहिलं होतं. त्यामुळे सुधाताईंना राग आला आणि त्यांनी जमशेद टाटांना एक खरमरीत पत्र लिहिलं. काही दिवसांनी त्यांना पुण्याहून एक पत्र आलं ज्यात त्यांना मुलाखतीसाठी बोलावलं होतं. मुलाखतीमधून त्यांची निवड झाली आणि टेल्कोमध्ये फ्लोरवर काम करणारी पहिली महिला होण्याचा त्यांनी मान मिळवला. जमशेद टाटांना भेटल्यावर त्यांच्या निगर्वी व्यक्तिमत्त्वाने त्या भारावून गेल्या होत्या. एवढं खरमरीत पत्र लिहूनही जमशेदजींनी एकदाही त्या पत्राचा उल्लेख कधी केला नाही. वास्तविक त्या पत्राचा चोळामोळा करून त्यांना कचर्‍यात फेकता आला असता. पण त्यांनी आवर्जून सुधाताईंना मुलाखतीसाठी बोलावलं. स्त्री-पुरुष समानतेसाठी झगडू इच्छिणार्‍या एका मुलीच्या भावना त्यांनी समजून घेतल्या. एकदा त्या गाडीची वाट पाहात उभ्या होत्या तेव्हा निव्वळ त्यांना एकटीला थांबावं लागू नये म्हणून जमशेदजी टाटा नारायण मूर्ती ये‍ईपर्यंत सुधाताईंबरोबर थांबले. स्वतः मोठ्या उद्योगसमूहाचे मालक असूनही एका कर्मचार्‍याबद्दल दाखवलेली आपुलकी त्यांच्या मोठ्या मनाचं दर्शन घडवून जाते.

या पुस्तकात नारायण मूर्तींची स्फूर्तिदायी कथाही आहे. सुधाताईंच्या आईने त्यांना बचतीचं महत्त्व पटवून दिलं होतं. तिने त्यांना एक सल्ला दिलेला होता, ‘नेहमी थोडे पैसे बाजूला काढून ठेव. काहीही झालं तरीही त्या पैशांना हात लावू नकोस. अगदी आणीबाणीच्या वेळेस ते उपयोगी पडतील.’ तो सल्ला सुधाताई लग्नानंतर अमलात आणत होत्या. संगणक क्षेत्रात पैसा आहे हे नारायण मूर्तींनी हेरलं होतं. या क्षेत्रासाठी लागणारी बुद्धिमत्ता आणि मेहनती वृत्ती भारतात विपुल प्रमाणात आहेत हेही त्यांनी ओळखलं होतं. असं असताना भारतातील तरुणांनी परदेशी कंपन्यांसाठी काम करावं हे त्यांना पटत नव्हतं. म्हणून एक भारतीय सॉफ्टवेअर कंपनी आपण सुरू करावी असं त्यांच्या मनात होतं. सुरुवातीच्या भांडवलाची कमतरता होती. अशा वेळी सुधाताईंनी केलेली बचत कामी आली. त्यांनी दिलेल्या दहा हजार रुपयांमधूनच भांडवलाची सोय झाली आणि १९८१ साली इन्फोसिसची स्थापना झाली. आणि पुढे काय घडलं तो इतिहास सर्वज्ञातच आहे.

सुधाताईंच्या आजीची कहाणी शिक्षणाचं महत्त्व पटवून देणारी आहे. त्यांच्या आजीला एका सुधाताई एक मासिक वाचून दाखवायच्या. एकदा त्या एके ठिकाणी लग्नाला गेल्या होत्या. परत आल्यावर आजीशी बोलताना त्यांना जाणवलं की आजीचे डोळे पाणावलेले आहेत. कारण विचारल्यावर आजी म्हणाली, ‘तू लग्नाला गेल्यावर मला मासिक वाचण्याची इच्छा झाली होती. पण त्यातलं एकही अक्षर मला कळलं नाही. तेव्हा मला जाणीव झाली की शिक्षण किती महत्त्वाचं आहे. तेव्हा मीही आता शिकण्याचा निश्चय केला आहे. तू मला उद्यापासून शिकव. येत्या गुरुपौर्णिमेला ते मासिक स्वतः वाचण्याची माझी इच्छा आहे.’ त्यानंतर सुधाताईंची आणि आजीची शिकवणी सुरू झाली. गुरुपौर्णिमेपर्यंत आजी वाचायला शिकली होती. गुरुपौर्णिमेला ते मासिक सुधाताईंनी आजीला भेट म्हणून दिलं. एवढं वय झालेलं असतानाही आजी शिकली यावरूनच शिक्षणाचं महत्त्व सिद्ध होतं.

या आणि अशा अनेक कथा या पुस्तकात आहेत. ही छोटी कथामौक्तिके मनाला स्पर्शून जातात. काही वेळा डोळ्यांच्या कडा पाणावतात, तर कधी काही प्रसंगांतून मनाला उभारी मिळते. आपणही वाचताना कथेतल्या व्यक्तीप्रमाणे ती कथा जगतो. प्रत्येकाने आवर्जून वाचावं असं ‘गोष्टी माणसांच्या’ हे पुस्तक आहे. कधी मिळालं तर नक्कीच वाचा. सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडित असणार्‍या आणि शब्दांचे फुलोरे न फुलवता साध्यासोप्या भाषेत लिहिलेल्या या कथा तुमच्या मनाचा नक्कीच ठाव घेतील.